Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी झाली! , आताच चेक करा 'या' गोष्टी आणल्या आहेत का ते?
गणेशोत्सवाचा उत्साह महाराष्ट्रासह देशभरात आता शिगेला पोहोचला आहे. अवघ्या काही तासांतच घराघरांत गणरायाचं आगमन होणार आहे. उद्या म्हणजेच 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी असून हा उत्सव तब्बल 11 दिवस चालणार आहे. 6 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा होईल. काही घरांत दीड दिवस, पाच दिवस किंवा गौरी-गणपतीसह गणेशोत्सव केला जातो, तर काही ठिकाणी गणरायांची प्रतिष्ठापना थेट अनंत चतुर्दशीपर्यंत केली जाते. त्यामुळे काही घरी आजच गणरायाचे आगमन झाले आहे, तर काही घरी उद्या सकाळी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले जाणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे स्नान करून घराघरांत गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मोदकांचा सुवास घराघरांत दरवळतो, आरती, टाळ, घंटानादाच्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलमय होतं. गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा केल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि विद्या, बुद्धी, समृद्धी मिळते, असा समज आहे. मात्र या सर्व धार्मिक विधीपूर्वी पूजेचं सगळं साहित्य नीट तयार असणं तितकंच महत्त्वाचं आहे.
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती, कलश, नारळ, सुपारी, आंब्याची पानं आणि डहाळे, ताम्हन, अक्षता, दूर्वा, मोदक, फुलं, धूप, निरांजन, गायीचं तूप किंवा तेल, कापूर, पूजेसाठी वस्त्र, गणरायासाठी वस्त्र, विड्याची पानं, फुलांच्या माळा, नाणी, नोटा, गुलाबजल, जानवं, पंचखाद्य, विविध फळं आणि प्रसाद. ही सगळी पूजाविधीची तयारी वेळेआधी करून ठेवल्यास सकाळी कोणताही गोंधळ होणार नाही आणि गणेशपूजा सुरळीतपणे पार पडेल.
गणरायाची प्राणप्रतिष्ठा आणि स्थापना झाल्यावर भक्त आपल्या इच्छेनुसार बाप्पाच्या 21 नावांचा जप करतात. “ओम गणराय नमः”, “ओम गं गणपतये नमः”, “ओम गं महागणपतये नमः”, “ओम गं वरदाय नमः” अशी 21 नावं उच्चारली जातात. या नावांचा जप केल्याने मनाला आंतरिक शांती मिळते, बुद्धी वाढते आणि घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं, असा श्रद्धेचा समज आहे.
गणेश चतुर्थी म्हणजे भक्तिभाव, आनंद, एकोपा आणि उत्साह यांचा संगम. त्यामुळे आरास, सजावट, प्रसाद आणि पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आजच तयार ठेवा आणि उद्या सकाळी मंगलमय वातावरणात गणरायाचं स्वागत करा.