Priyanka Gandhi X Post : प्रियांका गांधींनी युद्धासंदर्भात केलेल्या ट्विटमुळे इस्रायलचा पारा चढला; काय आहे 'त्या' ट्विटमध्ये?
इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या व खासदार प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. गाझा पट्टीतील परिस्थितीवरून भारत सरकारवर सडकून टीका करताना प्रियांका गांधी यांनी इस्रायलकडून नरसंहार होत असल्याचा आरोप केला. त्यांच्या या भूमिकेवर इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत प्रतिवाद केला आहे.
गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू असून आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये लहान मुलांचाही मोठा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरून मोदी सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, "इस्रायलने आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त लोकांना ठार केले आहे, त्यात 18,430 लहान मुलांचा समावेश आहे. शेकडो लोक अन्नावाचून मरत आहेत. या गुन्ह्यांवर गप्प राहणे हा देखील एक गुन्हा आहे, आणि भारत सरकारची ही भूमिका शरमेची बाब आहे," असे म्हटले.
या विधानाची दखल घेत इस्रायलचे भारतातील राजदूत रेवूएन अजार यांनी प्रियांका गांधींना थेट उत्तर दिले. त्यांनी म्हटले, "तुमची ही भूमिका चुकीची आहे. इस्रायलने हमासच्या 25 हजार दहशतवाद्यांचा निःपात केला आहे. हमास नागरिकांच्या आड लपून हल्ले करतो, गाझात जे लोक मदत घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही हमास लक्ष्य करतो. गाझा पट्टीत कोणताही नरसंहार सुरू नाही."
राजदूत अजार यांनी पुढे स्पष्ट केले की, इस्रायलने आतापर्यंत गाझा पट्टीत 20 लाख टनाहून अधिक अन्नधान्य व इतर आवश्यक साहित्य पोहोचवले आहे. मात्र, हमासकडून हे मदतीचे सामान हडपले जाते. त्यांनी हमासने पुरवलेल्या मृत्यू व हानीच्या आकडेवारीवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला देखील दिला.
या वादानंतर प्रियांका गांधींच्या वक्तव्यावर देशांतर्गत राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही या मुद्द्याने चर्चेला उधाण आले आहे. इस्रायल-हमास युद्धातील मानवी हक्कांचा प्रश्न आणि भारत सरकारची भूमिका या दोन्ही मुद्द्यांवर आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.