आरे वाचवण्यासाठी मुंबईकरांचं आंदोलन; आदित्य ठाकरेही उतरले रस्त्यावर

आरे वाचवण्यासाठी मुंबईकरांचं आंदोलन; आदित्य ठाकरेही उतरले रस्त्यावर

'आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल आणि मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Published by :
Sudhir Kakde

राज्यात आलेल्या नवीन सरकारने मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरे जंगलातच मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांकडून आरेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी पर्यावरणमंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज रविवारी भेट दिली. यावेळी पर्यावरणवाद्यांची भेट घेऊन या आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. 'आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल आणि मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईतील मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गाचं मेट्रो कारशेड फडणवीस सरकारच्या काळात आरेत उभारण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी आणि मुंबईकरांकडून विरोध होत होता. त्यावेळी शिवसेनेने देखील आरेमधील कारशेडला विरोध करत हा प्रकल्प इतरत्र उभारण्याचा शब्द मुंबईकरांना दिला. त्यानुसार ठाकरे सरकार येताच हा प्रकल्प आरे मधून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मध्यवधित आलेल्या नव्या शिंदे सरकारने पुन्हा एकदा कांजूरमधील प्रकल्पाला स्थगिती देत आरेतच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा पर्यावरणवादी आणि मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात असून आंदोलन करण्यात येत आहे. आज आरेत सुरू असलेल्या या आंदोलनाला युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

"अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा आपण आरे जंगल म्हणून घोषित केलं होतं आणि कांजूरला कारशेड करणार असा निर्णय घेतला होता. पण हे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झाले आणि आता आरेत पुन्हा कारशेड उभारून मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत," असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आरेतील कारशेड उभारणीचा निर्णय घेणाऱ्या सरकारवर तोफ डागली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com