Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींची 'मेक इन इंडिया'वर टीका: मोदी सरकार घोषणाबाजीत व्यस्त
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा उपक्रम अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. आर्थिक आव्हानांवर उपाय शोधण्याऐवजी केवळ घोषणाबाजी करण्यातच सरकार लक्ष देत असल्याची टीका त्यांनी केली.
सोशल मीडियावर राहुल गांधींनी लिहिलं, “‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून कारखाने अधिक उत्पादन करतील, रोजगार वाढेल असं सांगण्यात आलं होतं. मग आज उत्पादन इतक्या नीचांकी पातळीवर का पोहोचलं आहे? युवकांची बेरोजगारी वाढतेय का? आणि चीनमधून होणारी आयात दुप्पट का झाली आहे?”
ते पुढे म्हणाले की, 2014 पासून देशाच्या एकूण जीडीपीतून उत्पादनाचा वाटा घसरून 14 टक्क्यांवर आला आहे. फक्त घोषणा करून उपयोग नाही, भारताला आता खरी सुधारणा आणि मजबूत आर्थिक पाठबळ हवे आहे, जे लाखो लघु व मध्यम उद्योगांना सक्षम बनवेल.
राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर केवळ प्रतिमा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप केला. चीनमधून वाढलेली आयात आणि देशांतर्गत वाढती बेरोजगारी पाहता ‘मेक इन इंडिया’ उपक्रम अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतं, असंही त्यांनी म्हटलं.