Rahul Gandhi : मुजफ्फरपुरातून राहुल गांधींची बिहार प्रचारमोहीमेची सुरुवात

Rahul Gandhi : मुजफ्फरपुरातून राहुल गांधींची बिहार प्रचारमोहीमेची सुरुवात

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या प्रचार मोहीमेची सुरुवात मुजफ्फरपूर येथून केली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागले

  • मुजफ्फरपुरातून राहुल गांधींची बिहार प्रचारमोहीमेची सुरुवात

  • मोदी व नीतीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या प्रचार मोहीमेची सुरुवात मुजफ्फरपूर येथून केली. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत आयोजित संयुक्त सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार प्रहार केला. राहुल गांधी म्हणाले, “मोदीजींना जर सांगितलं की मतांच्या बदल्यात नाचा, तर ते मंचावर नाचतीलही. त्यांना छठ पूजेबद्दल किंवा यमुना स्वच्छतेबद्दल काहीही घेणंदेणं नाही, त्यांना फक्त तुमचा मतांचा हिशोब महत्त्वाचा.” त्यांनी पुढे दिल्लीत यमुनेतील प्रदूषणावर भाष्य करत म्हटले की, भक्त प्रदूषित पाण्यात पूजा करतात, पण पंतप्रधान खास बनवलेल्या स्विमिंग पूलमध्ये स्नान करतात. “मोदीजींचा छठ पूजेशी काही संबंध नाही,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

राहुल गांधींच्या या भाषणावर भाजपने तत्काळ पलटवार केला. भाजपकडून जारी झालेल्या प्रतिक्रीयेतील आरोपानुसार, राहुल यांच्या भाषणात “स्थानिक गुंडांसारखी भाषा” वापरण्यात आली असून, मोदी समर्थक मतदारांचा अपमान केला आहे. भाजपने म्हटले की, त्यांनी भारतीय मतदार आणि लोकशाहीचा अवमान केला आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावरही राहुल गांधींनी तितक्याच तीव्र शब्दांत टीका केली. “नीतीश कुमार यांनी 20 वर्षांत मागासवर्गीयांसाठी काहीही केलं नाही. त्यांचा चेहरा पुढे आहे, पण रिमोट कंट्रोल भाजपच्या हातात आहे.” अशी टीका त्यांनी केली. सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून त्यांनी नीतीश व भाजपवर दुहेरी हल्ला चढवला.

यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर “मत चोरी” चा आरोप करत म्हटले की, महाराष्ट्र आणि हरियाण्यात निवडणुका चोरल्यानंतर आता बिहारमध्येही तेच करण्याचा प्रयत्न होणार आहे. बिहारमध्ये जवळपास 66 लाख नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “लोकशाही व बिहारच्या आवाजासाठी महागठबंधनाला मतदान करा” असे आवाहन त्यांनी केले.

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, नोटबंदी आणि जीएसटीमुळे लघुउद्योग उद्ध्वस्त झाले. “तुमच्या मोबाईलच्या मागे काय लिहिलंय? मेड इन चायना! पण आम्ही म्हणतो, मेड इन बिहार हवं. युवकांना रोजगार मिळावा, बिहार पुन्हा शिक्षणाचे केंद्र व्हावे.” असे ते म्हणाले. त्यांनी नालंदा विद्यापीठाचे पुनरुत्थान हे यूपीए सरकारचे योगदान असल्याचेही स्मरण करून दिले. राहुल गांधी म्हणाले, “आम्ही अशी सरकार देऊ जी प्रत्येक जात, धर्म आणि समाजाचे प्रतिनिधित्व करेल. कोणालाही मागे राहू देणार नाही.” बिहारात बदल आणि न्याय्य सत्तेचे आश्वासन देत त्यांनी भाषणाची सांगता केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com