मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला; रेल्वेमंत्र्यांनी केला आरोप
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला गेला असल्याचा आरोप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. काल 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी 2.41 लाख कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना अश्विनी वैष्णव यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाहीत. मात्र, सरकार बदलताच आताच्या शिंदे-फडणवीस सरकारनं सर्व परवानग्या दिल्या असून प्रकल्पाला गती दिली जात आहे. असे ते म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला. बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाही असा आरोप त्यांनी केला आहे.