Weather Update : 17-18 फेब्रुवारीला राज्यात पावसाची शक्यता; तापमानात चढ-उतार

Weather Update : 17-18 फेब्रुवारीला राज्यात पावसाची शक्यता; तापमानात चढ-उतार

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तापमानात झपाट्याने वाढ होत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी काही प्रमाणात गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र आता हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 17 आणि 18 फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात.

उत्तर भारतात सातत्याने सक्रिय असलेल्या ‘वेस्टर्न डिस्टरबेंस’ अर्थात पश्चिम विक्षोभाचा परिणाम देशाच्या विविध भागांवर होत आहे. त्याचेच पडसाद महाराष्ट्रातही उमटण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे राज्यात काही भागांत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या बदलांमुळे वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात.

पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहू शकते. मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नसली तरी फेब्रुवारी महिन्यातील हा पर्जन्य शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. रब्बी हंगामातील पिकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि कांदा पिकांवर अवेळी पावसाचा परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हे वारे अधिक थंड झाले असून रात्रीच्या गारव्यात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देश भागात तापमानात काहीशी घट नोंदवली गेली आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. शहरात उकाड्यात वाढ झाली असून दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. सकाळचा गारवा कमी झाला असून रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे. कमाल आणि किमान तापमानातील वाढ नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. एकूणच, फेब्रुवारी महिन्यातील कोरड्या वातावरणानंतर आता राज्यात हवामानात वेगाने बदल होत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com