raj and yogi
raj and yogiteam lokshahi

...म्हणून राज ठाकरेंनी केले योगी आदित्यनाथांचे अभिनंदन

Published by :
Shweta Chavan-Zagade

राज्यातील मशिदींवरील भोंगे ( Masjid Bhonge ) उतरवण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली होती. या भूमिकेमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. यामधून काही घडले तर ज्या जखमा होतील त्या खोलवर जातील. त्यामधून नको ते प्रश्न निर्माण होतील. ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि प्रगतीशील राष्ट्राला परवडणारी नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार (ajit pawar) यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेविषयी विचारणा करण्यात आली. राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केले. पण योगींनी त्यांच्या राज्यात काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि न्याय देणार आहे. इतकी वर्षे सगळं काही चालत आले आहे. मग राज ठाकरे यांना तेव्हा कोणी थांबवले होते, कोणी नाही म्हटले होते, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या ज्या मागण्या करत आहेत, त्यामधून उद्या इतरही प्रश्न उद्भवतील. सर्वोच्च न्यायालयाचा भोंग्यांबाबतचा आदेश लागू करायचा म्हटला तर तो एकाच समूहासाठी लागू करून चालणार नाही. मात्र, भावनेच्या आहारी जाऊन ते समाजात तेढ निर्माण करत आहेत. यामुळे दोन जातींमध्ये अंतर निर्माण होईल. कारण नसताना भारतातील प्रगत राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात अशाने दरी निर्माण करायचा प्रयत्न केलाजात आहे. आपण मुंबईत राहत असल्यामुळे अशा काही गोष्टी आपल्या डोक्यातही नसतात. पण सतत तेच तेच सांगून लोकांच्या मनात नको त्या गोष्टी भरवल्या जातात. यामधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणार नाही. ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण या सगळ्यातून काही घडलं तर समाजात त्याच्या जखमा खोलवर होतील, असा इशाराही अजित पवार (ajit pawar) यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com