Raj thackeray : राज ठाकरेंची धर्मेंद्र यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट, म्हणाले
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवुडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. फक्त सेनेसृष्टीच नव्हे तर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. तसेच, १९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस
करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला, असे म्हणते राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
