स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज बिऱ्हाड आंदोलन
नाशिक जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्ज वसुलीच्या विरोधात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ' बिऱ्हाड ' आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामध्ये काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेकडून गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जातय. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यास सुरू केलय.
शेतकऱ्यांच्या दोन्ही मागण्या या सहकार मंत्री महोदय आणि शासन पातळीवरील आहेत. शेट्टी राजू आणि त्यांचे प्रतिनिधी यांची येत्या चार दिवसांत सहकार मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊ, येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांची आणि सहकार मंत्र्याशी बैठक घडवून आणून प्रश्न सोडवला जाईल. असे आश्वासन भुसे यांनी राजू शेट्टी यांना दिले आहे.
आज आम्ही मोर्चा काढणारच कारण आमच्या मागण्या पालकमंत्र्यांच्या लेव्हल वर नाही. आमचे आंदोलन सुरूच राहील, मोर्चा होईल. सकाळी दिंडोरी तालुक्यातील वणी पासून मालेगाव पर्यंत हे मोर्चा आंदोलन होईल. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. त्याचबरोबर या आंदोलनात हजारो शेतकरी यात सहभागी होतील. दादा भुसे यांच्या घरावर आंदोलन नेत आहोत, कारण पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी आमची अपेक्षा असे राजू शेट्टी म्हणाले.