सुभाष देसाई विकासनिधीसाठी कमिशन मागायचे; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शिवसेनेला सध्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून, पक्षाशी गद्दारी करुन गेलेल्या लोकांविरोधातच आता शिवसेनेला यापूढे लढा द्यावा लागणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे आता एकीकडे सत्ता गेलेली असताना दुसरीकडे पक्ष टिकवण्याचं सुद्धा मोठं आवाहन उद्धव ठाकरेंसमोर उभं राहिलं आहे. बंडखोर शिंदे (CM Eknath Shinde) गट भाजपसोबत (BJP) सत्तेत गेल्यानंतर आता अनेक दिवस उलटले असताना देखील आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजुंनी सतत सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी शिवसेना नेते सुभाष देसाईंवर गंभीर आरोप केले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्ष सोडून जाण्यात मराठवाड्यातील आमदार आघाडीवर होते. औरंगाबाद जिल्हातील वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे हे देखील शिंदेंसोबत पक्ष सोडून गेले होते. त्यांनी आता सुभाष देसाईंवर गंभीर आरोप केले आहेत. औरंगाबादचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्याला विकास निधीसाठी 10 टक्के कमिशन मागितलं होतं असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मात्र आता पुन्हा एकदा सेना आणि शिंदे गट आमने सामने येणार असल्याचं पाहायला मिळतंय. तरी आता शिवसेना यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.