Nitesh Rane : राणेंची आव्हाडांवर टीका; 'सनातनी दहशतवाद' वक्तव्यावरून शरद पवार गटाला प्रश्न
Nitesh Rane On Jitendra Awhad : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांच्या 'सनातनी दहशतवाद' संबंधित वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना उद्देशून प्रश्न विचारला आहे की, "जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं."
राणेंनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात."
ते पुढे म्हणतात, "खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो."
हिंदू परंपरेच्या सन्मानासाठी उभं राहत राणे म्हणाले, "सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे. ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे."
या टीकेच्या अखेरीस त्यांनी जोरदार इशारा दिला की, "इथल्या हिंदू समाजानं तुमच्या ‘बाटग्या’ विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाट्टोळे करू नका."
या प्रखर विधानामुळे राज्यात नवा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादीच्या नेत्या शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय येते, याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.