Shaktipeeth Mahamarg : '...तर रक्ताचे पाट वाहतील'; रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

"शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही", असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे.
Published by :
Rashmi Mane

"शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही", असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं आहे. आज, मंगळवार पंढरपूर येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. तसेच, "जबरदस्तीने जमीन अधिग्रहीत करण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील," असा इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला.

यावेळी तुपकर म्हणाले की, "मोठमोठ्या रस्त्यांच्या कामांमध्ये सरकार पैसे खातं. रस्त्यांची काम म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या पुढील निवडणुकीच्या खर्चाची तरतूद असते. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता फडणवीस सरकारचा आश्वासनावरून यूटर्न पाहायला मिळत आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा कायदा करा," अशी मागणी यावेळी रविकांत तुपकर यांची केली.

दरम्यान, "शेतकरी कर्ज माफीसाठी दोन दिवसात राज्याचा दौरा सुरू करणार, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा मोठा उठाव करून सरकारला सळो की पळो करणार," असंही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. "शेतकऱ्यांचा संयम सुटल्यास सत्ताधाऱ्यांना गावागावात फिरणे मुश्किल होईल," असेही त्यांनी नमूद केले. यावेळी "ज्येष्ठ शेतकरी नेत्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं," असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी राजू शेट्टी यांना दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com