Dada Bhuse : बोर्ड परीक्षेत कॉपी आढळलेल्या केंद्रांची मान्यता रद्द होणार, दादा भुसे यांचा इशारा
राज्यात १२ वी बोर्ड परीक्षेला १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असताना, राज्य सरकारच्या ‘कॉपीमुक्त परीक्षा अभियानाला’ पहिल्याच दिवशी धक्का बसल्याचे चित्र समोर आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना उघडपणे कॉपी पुरवली जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले असून, या घटनेमुळे पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. परीक्षा प्रक्रियेसाठी शाळांना सीसीटीव्ही बसविणे, पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, बसेस वेळेत पोहोचविणे यांसह सर्व आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही केंद्रांवर गैरप्रकार घडल्याने शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कॉपीच्या घटना ज्या केंद्रांवर आढळल्या आहेत, त्यांची मान्यता रद्द केली जाईल. संबंधित केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक तसेच कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि गरज भासल्यास पालकांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “कॉपीमुक्त परीक्षा अभियानात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कॉपीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इंग्रजीच्या पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल १९ जणांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार तपास करण्यात आला. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने संपूर्ण चौकशी पूर्ण केली आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले असून इतर संबंधितांवर संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, पुढील परीक्षा सत्रात अधिक कडक देखरेख ठेवण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
