CM Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना दिलासा लवकरच! कर्जमाफीवर अंतिम आठवड्यात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
(CM Devendra Fadnavis) नागपूर येथे पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडा प्रस्तावावरील चर्चेत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. पुढील तीन वर्षांत राज्यात १ लाख २० हजार शासकीय भरती केली जाणार असून विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यांत मोठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून जवळपास ९२ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. काही ठिकाणी मदत न मिळाल्याचे आरोप होत असले तरी बहुसंख्य शेतकऱ्यांना रक्कम मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी हजारो विहिरींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्य सरकारने यापूर्वी विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते. या अंतर्गत पायाभूत सुविधा, रोजगार हमी योजनेतील कामे आणि थेट शेतकरी मदत यांचा समावेश होता. रब्बी पिकांसाठी अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात आली असून पशुधन नुकसानभरपाईही दिली जात आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामे सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. वारंवार कर्जमाफीची गरज भासू नये यासाठी कायमस्वरूपी उपाय आवश्यक आहेत. यासाठी समिती काम करत असून १ जुलैपर्यंत नवीन धोरण जाहीर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
थोडक्यात
नागपूर येथे पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडा प्रस्तावावरील चर्चेत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
पुढील तीन वर्षांत राज्यात १ लाख २० हजार शासकीय भरती केली जाणार असून विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार असल्याचे त्यांनी सांगितले

