गेस्ट टायगरला वर्ध्यात केले जाणार 'रेस्क्यू', चिखलामुळे वनविभागाला अडचणी

गेस्ट टायगरला वर्ध्यात केले जाणार 'रेस्क्यू', चिखलामुळे वनविभागाला अडचणी

सिर्सी मार्गे वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील उंदिरगाव शिवारात एन्ट्री केलेल्या गेस्ट टायगरने (पाहुणा वाघ) समुद्रपूर तालुक्याची सीमा ओलांडून हिंगणघाट शहराशेजारील रिमडोह पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भूपेश बारंगे | वर्धा: सिर्सी मार्गे वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील उंदिरगाव शिवारात एन्ट्री केलेल्या गेस्ट टायगरने (पाहुणा वाघ) समुद्रपूर तालुक्याची सीमा ओलांडून हिंगणघाट शहराशेजारील रिमडोह पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. या पाहुण्या वाघाने अद्याप कुठल्याही मनुष्यावर हल्ला केला नसला तरी मानव व वन्यजीव संघर्ष टाळावा तसेच या पाहुण्या वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडता यावे या हेतूने संबंधित पट्टेदार वाघाला रेस्क्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर या पट्टेदार पाहुण्या वाघाला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. उलेखनीय म्हणजे ज्या परिसरात वाघाची मुव्हमेंट होती तेथे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने वाघाला रेस्क्यू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणाऱ्याना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण वृत्तलिहिस्तोवर वाघाला रेस्क्यू करण्यात यश आले नव्हते.

ताडोब्यातील तज्ज्ञांची चमू दाखल

पाहुण्या वाघाला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाने चंद्रपूर येथील तज्ज्ञांच्या चमूला पाचारण केले आहे. वर्धा वनविभागाच्या विनंतीला मान देत 60 हून अधिक पट्टेदार वाघ व बिबटांना अचूक नेम मारून बेशुद्ध करीत अब तक छप्पन अशी वेगळी ओळख निर्माण करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे व त्यांची चमू हिंगणघाट तालुक्यातील रिमडोह शिवारात मुक्त संचार करणाऱ्या वाघाला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी हिंगणघाट येथे मंगळवारी दाखल झाली आहे. मंगळवारी संबंधित पट्टेदार वाघाला रेस्क्यू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. पण ज्या परिसरात वाघाने आश्रय घेतला तो परिसर चिखलमय असल्याने रेस्क्यू करणाऱ्यांना सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत यश आले नव्हते.

बड्या अधिकाऱ्यांनीही मांडले ठाण

संभाव्य मानव व वन्यजीव संघर्ष टळावा तसेच नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ भटकंती करणाऱ्याला वाघाला रेस्क्यू करण्यासह ट्रॅक्युलाइज करण्यासाठी वरिष्ठांना परवानगी मागण्यात आली. त्याला वरिष्ठांनी हिरवी झेंडी दिल्याने मंगळवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तज्ज्ञांची चमूही हिंगणघाट परिसरात दाखल झाली. ज्या परिसरात वाघाचा वावर होत आहे त्या परिसरात पिंजराही आणण्यात आला. इतकेच नव्हे तर वाघाला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न होत असताना वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रिमडोह शिवार गाठला होता.

24 तास ऑब्झरव्हेशनानंतर सोडणार सुरक्षित ठिकाणी

मंगळवारी पाहुण्या वाघाला सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न वनविभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी केले. पण सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत संबंधित वाघाला रेस्क्यू करण्यात यश आले नव्हते. सुरक्षित रेस्क्यू केल्यानंतर वाघाला सुरूवातीला 24 तास ऑब्झरव्हेशन मध्ये ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com