दोन हजारांची नोटाबंदी जाहीर, 50 खोकेवाल्यांच्या दुःखात मात्र सहभागी व्हावे लागेल; सामनातून टोला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढल्या आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. यावर अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनातून म्हटले आहे की, त्या पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली जाते, पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली, ना सळसळ झाली. दोन हजारांची नोटाबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे. देशाच्या चलनात दोन हजारांच्या नोटा किती आहेत व लोकांनी त्यातील किती दडवून ठेवल्या आहेत? हे एक रहस्य आहे. मोदींनी हजाराची नोट चलनातून बाद केली व दोन हजारांची गुलाबी नोट आणली. त्यामुळे हजार-पाचशेत होणारी लाचखोरी दोन हजारांच्या नोटेत पोहोचली, हेच नोटाबंदीचे फायदे. आता मोदींनी ‘लहर’ आली म्हणून दोन हजारांची नोटही बाद केली. हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच कर्नाटकच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजारांची मात्रा चालली नाही. त्या चिडीतूनही ‘दोन हजारांची नोट बाद’ असा निर्णय झालेला असू शकतो. . ५० खोकेवाल्यांच्या दुःखात मात्र सहभागी व्हावे लागेल. त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल. त्यांची धावपळ समजून घ्यावी लागेल इतकेच. दोन हजारांची नोट चालू करून मोदी हे दहशतवादाची कंबर तोडणार होते व आता तीच दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर तोडत आहेत. असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.