Sambhaji Raje : 'रायगडवरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा'; संभाजी राजेंचं फडणवीसांना पत्र

Sambhaji Raje : 'रायगडवरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा'; संभाजी राजेंचं फडणवीसांना पत्र

संभाजी राजेंनी रायगड किल्ल्यावर वाघ्या श्वानाची समाधी हटवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. शिवकालीन इतिहासात वाघ्याचा उल्लेख नसल्याने ही समाधी काढून टाकावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी केलेली आहे. माजी खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी केली आहे.

तसेच ही समाधी सदृश्य संरचना येत्या 31 मे पूर्वी हटवावी अशी अल्टिमेटम डेडलाइन देखील दिली आहे. शिवकालीन इतिहासात कुठलाही वाघ्या नामक कुत्र्याचा उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. वाघ्याचा इतिहास केवळ कपोलकल्पित आहे, त्यामुळे अशा प्रकारे कपोल कल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचं युवराज संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती हे पत्रात नेमकं काय म्हणाले ?

हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.

भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली...

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com