Sanjay Raut : "सर्जिकल स्ट्राईक आम्हीपण गल्लीत करतो, बैठका कसल्या घेता?"

Sanjay Raut : "सर्जिकल स्ट्राईक आम्हीपण गल्लीत करतो, बैठका कसल्या घेता?"

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "हा हल्ला झाल्यावर पहिल्या 24 तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता. जगभरात याच पद्धतीने बदला घेतला जातो. एक सैनिक जरी मारला गेला किंवा माणूस जरी मारला गेला तर ताबडतोप उत्तर देतात. काश्मिरच्या सुरक्षेची जबाबदारी पण सैनिकांवरच होती. सगळ्यात आधी कारवाई करायची असेल तर आधी गृहखात्यावर केली पाहिजे. सरकारच्या चुकांच्या पाठिशी असता कामा नये. सरकार वारंवार चुका करतं आहे. आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर त्यांनी राजीनामा मागितला असता."

"सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही. काश्मिरवर चर्चा करण्यासाठी संसदेत विशेष अधिवेशन बोलवायला हवं. पण सरकार काश्मिरवरती कोणालाही बोलू देणार नाही. तुम्ही कोणाला पाठिशी घालत आहात. हा मानवीसंहार सरकारच्या गाफिलपणामुळे झालेला आहे. पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला हवा होता. पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? सर्जिकल स्ट्राईक ठिक आहे. सर्जिकल स्ट्राईक आम्हीपण गल्लीत करतो. बैठका कसल्या घेता?" असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com