"नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पैशाच्या ताकदीवर ठाकरेंचं सरकार पाडलं", संजय राऊतांचा घणाघात
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली. कापसाला, सोयाबीनला, संत्र्याला भाव नाही. भाव आहे तो, गद्दार आमदाराला आणि खासदाराला. आमदाराचा भाव ५० कोटी आणि खासदाराचा भाव १०० कोटी. पण तुम्हाला भाव नाही. तुमच्या मालाला भाव नाही. आमदार गुवाहाटीला, सुरत आणि गोव्याला जातो. प्रत्येक ठिकाणी २५-२५ कोटी रुपये त्याच्या हातात ठेवले जातात. पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं उत्तम चाललेलं सरकार पाडलं. सुंदर चाललेलं सरकार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पैशाच्या ताकदीवर मोडून काढलं, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली.
संजय राऊत जनतेला संबोधित करताना म्हणाले, २०१४ पूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा सिलेंडर ३९० रुपये होता. मोदी आल्यावर १४०० रुपये सिलेंडर झाला. आम्हाला २०१४ च्या आधीचे अच्छे दिन पाहिजेत. २०१४ पूर्वी आमचं जीवन उत्तम चाललं होतं, ते आम्हाला परत करा. ज्या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष तुमची कुटुंबप्रमुखाप्रमाणे काळजी घेतली. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी काळजी घेतली. २ लाखांचं तुमचं कर्ज तातडीनं माफ केलं. असं हे उत्तम सरकार या गद्दारांना हाताशी पकडून भाजपनं पाडलं. सुंदर चाललेलं सरकार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पैशाच्या ताकदीवर मोडून काढलं.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मराठी माणसाच्या न्यायासाठी स्थापन केलेली शिवसेना फोडली. ४० आमदार फोडले. जो पर्यंत ठाकरे शिवसेना आहे, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई तोडता येणार नाही. ४० आमदार पळून गेले असतील, पण ४० आमदारांना निवडून देण्याची ताकद आमच्या शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या मागे आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, असा खटला सुरु होता.
पक्षाचे संस्थापक शरद पवार निवडणूक आयोगासमोर सुनावणीच्यावेळी बसले होते. आम्ही तिथेच होतो. पक्षाचा संस्थापक समोर बसलेत, तरीही निवडणूक आयोग सांगतो, राष्ट्रवादी पक्ष तुमचा नाही. ही या देशाची परिस्थिती आहे. ही या लोकांची हुकूमशाही आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा. आख्खा भाजप भाडोत्र्यांचा पक्ष आहे, असंही संजय राऊत म्हणाले.