Sanjay Raut
Sanjay Raut

"महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलाय"; मतांच्या स्ट्राईक रेटबाबत भाष्य करणाऱ्या विरोधकांवर राऊतांचा हल्लाबोल

""महाराष्ट्र राज्यानं मोदींच्या पराभवात हातभार लावला. महाराष्ट्रामुळे मोदींनी बहुमत गमावलं. त्यामुळे शेतकऱ्यांवर सूड घेतला जात आहे का? अशी चिंता आम्हाला वाटत आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Sanjay Raut Press Conference : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमरावतीत जावं. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जो आकडा सांगितला आहे, यावर त्यांनी चिंतन आणि मनन केलं पाहिजे. हा आकडा फक्त अमरावतीचा नाही. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून असे आकडे येत आहेत. हे मिंधे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केलीय का? अजिबात नाही. त्यांना १८८ जागा जिंकायच्या आहेत. त्याच्यावर ते बोलतात. कुणाला किती टक्के मतं मिळाली आहेत, याची आकडेवारी काढत आहेत. ते स्ट्राईक रेट काढत आहेत. पण या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढला आहे. शिंदे, फडणवीस, अजित पवार, देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या आत्महत्येचा वाढलेल्या स्ट्राईक रेटची चिंता वाटत नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारसह विरोधकांवर तोफ डागली आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत पुढे म्हणाले,अमरावती नाही, तर महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं केंद्रबिंदू झालं आहे. महाराष्ट्र राज्यानं मोदींच्या पराभवात हातभार लावला. महाराष्ट्रामुळे मोदींनी बहुमत गमावलं. त्यामुळे शेतकऱ्यांवर सूड घेतला जात आहे का? अशी चिंता आम्हाला वाटत आहे. शेतकऱ्यांसाठी कोणतीही धोरणं राबवली जात नाहीत. आजही शेतकरी कर्जबाजारी आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचं कर्ज माफ केलं होतं. तो त्यांना मिळालेला शेवटचा दिलासा होता. त्यानंतर गेल्या अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही.

अनेकदा गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडला आहे. सरकार जागेवर नाही. सरकार विधानसभेच्या कामाला लागला आहे. मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची, याची सरकारला चिंता आहे. शिवसेनेला ९ जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला ३१ जागा कशा मिळाल्या, यावर त्यांचं संशोधन सुरु आहे. पण अमरावतीसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतोय, याच्यावर ते कोणत्याही प्रकारचं भाष्य करत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com