शरद पवारांच्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय झाला, बावनकुळेंच्या विधानाचा सुप्रिया सुळेंनी घेतला समाचार; म्हणाल्या...
शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही, बी-बियाणे मिळत नव्हती, मोदींनी शेतकऱ्यांना मजबूत केलं, शरद पवारांच्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय झाला, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते, यावर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला अतिशय प्रांजळपणे सांगायचं आहे की, पवार साहेबांनी ५० वर्षात महाराष्ट्रात आणि देशात जे काम केलं, त्याचं पद्मविभूषण त्यांच्याच सरकारने पवार साहेबांना दिलं आहे.
बारामतीत दमदाटीचे प्रकार घडत आहेत, यावर बोलताना सुळे म्हणाल्या, आम्ही खूप पारदर्शक आयुष्य जगतो. याबाबत आम्ही नक्कीच माहिती घेऊ. अजितदादा पहिल्यासारखे राहिले नाहीत, त्यांच्यात खूप बदल झाला आहे, असं रोहित पवार म्हणाले होते. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सर्व प्रश्नांची उत्तरे एकच आहेत, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. कांद्याला भाव नाही. दुधाला भाव नाही. आयआयटीतल्या ३५ टक्के मुलांना नोकरी मिळत नाही. देशात सर्वात जास्त सुशिक्षीत बेरोजगार आहे. बेरोगजारी, शेतकऱ्याला हमीभाव मिळवून देण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, कांद्याची निर्यातीवर असलेली बंदी उठवण्यासाठी मला निवडून यायचं आहे.
दहा ते बारा वर्षात बारामतीत तुम्ही काहीच विकास केला नाही, असा आरोप विरोधक करतात, याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या कामाचं पुस्तक हे मी त्यांना पाठवलेलं आहे. जर त्यांनी अर्धा-पाऊण तास वाचलं तर ते नक्की मलाच मतदान करतील. मी कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. कोणत्या मंत्र्यावरही टीका करत नाही. माझ्या मतदारसंघाचा उल्लेख पारदर्शकपणे तुमच्यासमोर आहे.