महायुतीसोबत जाण्याची PM मोदींची ऑफर स्विकारणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले; "त्यांच्या राजकीय विचारांसोबत..."
Sharad Pawar Press Conference : नंदूरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्हाला आणि उद्धव ठाकरेंना महायुतीसोबत येण्याची ऑफर दिलीय, यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, आज देशात संसदीय लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आमचे व्यक्तीगत संबंध चांगेल आहेत, पण मी त्यांच्या राजकीय विचारांसोबत जाणार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली. यामागे केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकशाही पद्धतीवर कुणाचा कितपत विश्वास आहे. ज्या व्यक्तीचा, पक्षाचा, ज्या धोरणाचा आणि ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही, असा समज लोकांमध्ये पक्का झालेला असेल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.
पवार पुढे म्हणाले, आमची विचारधारा महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरुंची आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला आहे. हा देश एकसंध ठेवायचा असेल, इथे हिंदू, मुस्लिम, शीख, जैन या सर्व घटकांना एकत्र ठेवून हा देश पुढे न्यावा लागेल. एका धर्मासाठी आपण वेगळी भूमिका मांडायला लागलो, तर समाजात ऐक्य राहणार नाही.
सर्व समाजात गैरविश्वास निर्माण व्हायला मोदींची भाषणे पोषक आहेत. देशाच्या दृष्टीने ते घातक आहे. जे देशाच्या हिताचं नाही, तिथे आमचे सहकारी असणार नाहीत. पहिल्या, दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाचा आढावा घेतला तर मोदींच्या विरोधात जनमत असल्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ते अस्वस्थ असल्याने अशी विधाने करत आहेत.
तेलंगणात अमित शहा म्हणाले, आम्ही मुस्लिमांचं आरक्षण रद्द करू आणि एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण वाढवू, काँग्रेसने इतर समाजावर अन्याय केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, एससी, एसटी यांचं आरक्षण वाढवायचं असेल, तर आमचा विरोध नाही. पण एखाद्या समाजाविषयी राज्यकर्त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नाही. प्रधानमंत्री सर्वांचे असतात. ते देशाचे असतात. जो देशाचं नेतृत्व करतो, त्याने एका धर्माचं, एका जातीचं, एका भाषेचा विचार केला, तर या देशाचं ऐक्य धोक्यात येईल, असंही पवार म्हणाले.