Sanjay Raut : शरद पवार पुन्हा राज्यसभेत? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; मविआत चर्चांना वेग

Sanjay Raut : शरद पवार पुन्हा राज्यसभेत? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; मविआत चर्चांना वेग

एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार असून त्यामध्ये ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होणार असून त्यामध्ये ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत Sanjay Raut यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राऊत म्हणाले की, “एप्रिलमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा विचार करता, तिन्ही पक्षांनी मिळून एकच उमेदवार उभा करणे शक्य आहे. कारण तिन्ही पक्षांचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ.” या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राऊत यांनी पुढे सांगितले की, त्यांची अलीकडेच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. “मी त्यांना विचारले की, आपण पुन्हा राज्यसभा निवडणूक लढवणार का? त्यावर पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की, ते ही निवडणूक पुन्हा लढवण्याच्या भूमिकेत आहेत,” असे राऊत म्हणाले. पवार यांचा संसदीय अनुभव ६० वर्षांहून अधिक असल्याने त्यांची उपस्थिती संसदेत महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. पवार यांनी आपली भूमिका काँग्रेसलाही कळवली असल्याची माहिती राऊत यांनी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विषयावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील राजकारणात आणखी एका मुद्द्यावरून खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी झिरवळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “मंत्रालयातील कार्यालय एसीबीने सील केले आहे, ही गंभीर बाब आहे,” असे त्यांनी म्हटले.

या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढताना दिसत आहे. आता शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीचा अधिकृत निर्णय काय होतो, तसेच नरहरी झिरवळ प्रकरणी पुढील कारवाई काय होते, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com