बालपण हरवलेल्या चिमुकलीच्या डोक्यावर वीटांचा थर; शिक्षणाचे धडे गिरवण्याच्या वयात ती मजुराप्रमाणे करत आहे काम
गोपाल व्यास, वाशिम| बालवय हे संस्काराचे वय असते, ज्यामधून मुलांचे भवितव्य ठरते. बालवयात मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. या वयात बालकांची स्मरण शक्ती प्रगल्भ असते, त्यामुळे त्यांना शैक्षणिकबाबी अगदी सहजपणे लक्षात येतात. परंतु याच बालवयात शिक्षणाचे धडे गिरवण्याऐवजी कारंजा अमरावती या महामार्गावर खुलेआम चालत असलेल्या अवैध वीटभट्टीच्या कारखान्यात चिमुकली ही मजुरांप्रमाणे काम करत आहे. याकडे मात्र बालकल्याण व महसूल विभागाच्या प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. या संबंधित अधिकारी यांनी लक्ष देवून बालमजुरी थांबवून वीटभट्टी मालकावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही मागणी मनसेच्या वतीने व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
जे वय खेळण्या बागडण्याचे हट्ट धरण्याच्या व शाळेत शिक्षणाचे धड्डे घेण्याचे असते, त्याच वयात ही चिमुकली वीटभट्टीवर राब राब राबताना दिसत आहे. 14 वर्षांखालील मुलांना किंवा मुलींना कोणत्याही उद्योग व्यवसायात काम करण्यास मनाई असताना मुलांना कामावर ठेवणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास व 20 ते 50 हजारांपर्यंत दंडाची शिक्षा आहे. मात्र हा कायदा फक्त कागदोपत्रीच आहे का? असा देखील प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
वाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या कामांमध्ये बालपण हरवलेली मुले आजही ठिकठिकाणी दिसतात. बालमजुरी नावाचा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे. हे सर्वज्ञात आहे, तरी देखील भर रस्त्यात सर्वांसमक्ष हे प्रकार चालू आहेत. याबाबत वाशिम जिल्हा प्रशासन व बाल कामगार कल्याण मात्र फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका पार पाडत आहे.