महाराष्ट्राचा विजय! राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा महाराष्ट्राचा विजय असल्याचं ट्विटरवरुन ट्विट करत म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांचं ट्विट, महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाहीतले आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे मोदीजींनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.