"खासदार असो किंवा पदाधिकारी सर्वांना..." निवडणुकीच्या तोंडावर आमदार संजय सिरसाटांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून काही ठिकाणी जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. तिकीट न मिळालेले उमेदवार नाराज होऊ नयेत, यासाठी शिंदे गटाकडून खलबतं सुरु आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. काल वर्षावर बैठक झाली. या बैठकीला काही आमदार आणि मंत्री उपस्थित होते. काहींना उमेदवारी तिकीट मिळालं नाही, याबाबत बैठकीत चर्चा झाली. खासदार असो किंवा पदाधिकारी सर्वांना सामावून घेतलं जाईल. ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांना बाजूला केलं जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय, असं शिरसाट म्हणाले.
शिरसाट पुढे म्हणाले, एकनाथ खडसे गेली ३०-४० वर्षे भाजपमध्ये काम करत आहेत. काही खटके उडाले म्हणून त्यांनी पक्ष सोडला होता. पण आता काही नेत्यांसोबत त्याचं जुळलं आहे. त्यामुळे ते घरवापसी करत आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांना वेळ देणारे नाना पटोले कोण आहेत? असा सवाल उपस्थित करत शिरसाट यांनी पटोलेंवर हल्लाबोल केला.
शिरसाट कल्याण भिवंडीच्या महायुतीच्या वादावर बोलताना म्हणाले, काल आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे की, कल्याण-भिवंडीची जागा निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी अर्ज भरल्यास विजय निश्चित आहे. मग ती जागा आम्ही का सोडावी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघरच्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत, असंही शिरसाट म्हणाले.