दिल्लीच्या तख्ताने महाराष्ट्राच्या सन्मानाचा, विकासाचा गळा घोटण्याचा जो चंग बांधला आहे त्याचे काय?  ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

दिल्लीच्या तख्ताने महाराष्ट्राच्या सन्मानाचा, विकासाचा गळा घोटण्याचा जो चंग बांधला आहे त्याचे काय? ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल

मंत्रिमंडळ बैठकीत कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar

मंत्रिमंडळ बैठकीत कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून शिंदे - फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, “निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा!”असे हे कडवे म्हणजे महाराष्ट्र गीताचा ज्वलंत आत्मा व खरी गर्जना आहे. हा आत्माच वगळला व गर्जनाच दाबली तर उरले काय? त्यामुळे सरकारने याबाबतीत सत्य काय ते समोर आणायला हवं.

महाराष्ट्र गीतातील तिसऱ्या कडव्यातील दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र आज राहिला आहे की नाही हे स्पष्ट व्हायलाच हवे. कुणाला आवडो वा ना आवडो, महाराष्ट्र म्हणजे देशाची ढाल–तलवार हे सत्य आहेच! दिल्लीकरांनाही ते मान्य करावेच लागेल. “महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल, पण आम्ही मात्र लाचार बनून दिल्लीचे खूर चाटत राहू असे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे व त्यामुळेच की काय, या महाराष्ट्र गीतातील तिसरे कडवे गाळले असून महाराष्ट्राच्या नशिबी अर्धेअधुरे राज्यगीत आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे राज्यगीत घोषित करताना तिसऱ्या कडव्यातील महत्त्वाचा ‘एल्गार’ वगळला आहे; कारण त्यात ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ हा उल्लेख आहे व सध्याच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांना हा उल्लेख अजिबात आवडणार नाही! तेव्हा या गीतातील हे कडवे वगळले आहे काय? व वगळले असेल तर त्यामागची मिंधे सरकारची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट व्हायला हवे.” असे सामनातून म्हटले आहे.

यासोबतच “दिल्लीदरबारी महाराष्ट्राचा पावलोपावली अपमान होत असताना अपमानित राज्य सरकारने महाराष्ट्राला राज्यगीत दिले आहे. देशाला ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आहे. तसे महाराष्ट्रासाठी स्वतंत्र असे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. एका बाजूला राज्यगीताची घोषणा झाली व दुसऱ्या बाजूला केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या नशिबी रिकामी खोकाच आला. मुंबईलाही भोपळाच मिळाला. या गीताचे जनक ज्येष्ठ कवी राजा बढे आहेत आणि ते गायले आहे शाहीर साबळे यांनी. त्यांच्या या महाराष्ट्र गीताने महाराष्ट्राला जाग आणण्याचे काम नेहमीच केले. महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वैभव, शौर्य, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक वारशांचा अभिमान या गीतांतील शब्दाशब्दात ठासून भरला आहे. महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले, पण सध्या दिल्लीच्या तख्ताने महाराष्ट्राच्या सन्मानाचा, विकासाचा गळा घोटण्याचा जो चंग बांधला आहे त्याचे काय?” असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com