Ajit Pawar Death : आता पर्यंत माजी पंतप्रधानांसह देशाने विमान अपघातात गमावले बडे नेते

Ajit Pawar Death : आता पर्यंत माजी पंतप्रधानांसह देशाने विमान अपघातात गमावले बडे नेते

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या 7 महिन्यांमध्ये विमान अपघाताची दुसरी घटना घडली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या 7 महिन्यांमध्ये विमान अपघाताची दुसरी घटना घडली आहे. जून 2025 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. भारताच्या इतिहासात आतापर्यंत 7 मोठ्या नेत्यांचा मृत्यू विमान किंवा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झाला आहे.

बलवंतराय मेहता – ते १९६३ ते १९६५ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. १९६५ च्या युद्धादरम्यान मेहता कच्छच्या रणात निरीक्षणासाठी उड्डाण करत होते. त्याचवेळी पाकिस्तानने त्यांचे विमान पाडले. या दुर्घटनेत मेहता, त्यांची पत्नी, तीन कर्मचारी, एक पत्रकार आणि दोन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. मेहता हे विमान अपघातात मृत्यू पावणारे पहिले मोठे राजकीय नेते होते.

संजय गांधी – २३ जून १९८० रोजी काँग्रेसचे तत्कालीन खासदार संजय गांधी दिल्लीतून विमान प्रवासाला निघाले होते. संजय यांना विमान उडवण्याचा शौक होता. सकाळी १० वाजता विमान घेऊन उड्डाण केल्यानंतर एक स्टंट दाखवताना त्यांचे विमान क्रॅश झाले. संजय यांच्यासोबत त्यांचे सहप्रवासी सुभाष सक्सेना यांचाही मृत्यू झाला.

माधवराव सिंधिया – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांचाही मृत्यू विमान अपघातात झाला. ३० सप्टेंबर २००१ रोजी सिंधिया कानपूरच्या एका रॅलीसाठी जात होते. मैनपुरीजवळील मोटागाव येथे त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात सिंधिया यांचा मृत्यू झाला. तेव्हा सिंधिया ५६ वर्षांचे होते.

जी.एम.सी. बालयोगी – गंती मोहना चंद्र बालयोगी यांचा मृत्यू लोकसभा अध्यक्ष पदावर असताना झाला. २००२ मध्ये आंध्र प्रदेशातील एका कार्यक्रमासाठी जाताना त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात बालयोगी यांचे सुरक्षा अधिकारी डी. सत्य राजू आणि पायलट कॅप्टन जी.व्ही. मेनन यांचाही मृत्यू झाला.

वाई. राजशेखर रेड्डी – आंध्र प्रदेशात २००९ मध्ये आणखी एक अपघात झाला होता. यावेळी मुख्यमंत्री वाई. राजशेखर रेड्डी यांचा बळी गेला. सप्टेंबर २००९ मध्ये रेड्डी आपल्या अधिकाऱ्यांसह नल्लामाला भागातून जात होते. त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. काही माध्यमांमध्ये नक्षलवाद्यांनी हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला गेला, मात्र सरकारने तेव्हा हा दावा फेटाळला होता.

विजय रुपाणी – १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले. या विमानातून विजय रुपाणी प्रवास करत होते. रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. संध्याकाळी मृतकांची यादी जाहीर झाली तेव्हा त्यात रुपाणी यांचे नाव होते. रुपाणी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनला जात होते.

डोरजी खांडू – अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री डोरजी खांडू यांचाही २०११ मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. खांडू तेव्हा ५६ वर्षांचे होते. खांडू तवांगहून राजधानी इटानगरकडे जात होते. तेव्हा त्यांचे विमान बेपत्ता झाले आणि नंतर क्रॅश झाल्याचे समोर आले

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com