Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा

ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये जो संयम भारताने बाळगला होता तो ऑपरेशन सिंदूर 2.0 मध्ये वापरणार नाही. यावेळी भारत अशी कारवाई करेल की, कदाचित पाकिस्तानला विचार करावा लागेल की त्याला भौगोलिकदृष्ट्या अस्तित्वात राहायचे आहे की नाही.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये जो संयम भारताने बाळगला होता

  • भारताच्या पाठीमागे संपूर्ण जग एकवटले

  • भारताने संपूर्ण जगाला पुरावे दाखवले

ऑपरेशन सिंदूर 1.0 मध्ये जो संयम भारताने बाळगला होता तो ऑपरेशन सिंदूर 2.0 मध्ये वापरणार नाही. यावेळी भारत अशी कारवाई करेल की, कदाचित पाकिस्तानला विचार करावा लागेल की त्याला भौगोलिकदृष्ट्या अस्तित्वात राहायचे आहे की नाही. जर, पाकिस्तानला भूगोलात आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर पाकिस्तानने आपला राज्य-पुरस्कृत दहशतवाद थांबवावा असा थेट इशारा भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. राजस्थानमधील नई मंडी घडसाना येथील गाव २२ एमडी या सीमावर्ती भागाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

भारताच्या पाठीमागे संपूर्ण जग एकवटले

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे एकवटले. या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. त्यापैकी सात ठिकाणी लष्कराने आणि दोन ठिकाणी हवाई दलाने हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने निर्दोष लोकांचा बळी जाणार नाही आणि कोणत्याही लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले जाणार नाही असा निर्धार केला होता. आमचे ध्येय दहशतवादी अड्डे, प्रशिक्षण केंद्रे आणि त्यांच्या लीडरला नष्ट करणे हाच होते असेही द्विवेदी यांनी सांगितले.

भारताने संपूर्ण जगाला पुरावे दाखवले

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये नष्ट झालेल्या दहशतवाद्यांच्या (Terrorist Spot) अड्ड्यांचे पुरावे भारताने संपूर्ण जगाला दाखवले आहेत. जर भारताने हे पुरावे जगासमोर उघड केले नसते तर, पाकिस्तानने ते लपवले असते. भारताने ऑपरेशन सिंदूर 1.0 दरम्यान दाखवलेला संयम भारत यानंतरच्या कारवाईत कधीही वापरणार किंवा दाखवणार नाही. ते म्हणाले की, यावेळी भारत पुढील कारवाई अशी करेल की, पाकिस्तानला इतिहास आणि भूगोलात राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. जर पाकिस्तानला इतिहासात आपले स्थान प्रस्थापित करायचे असेल तर, पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे असे सांगत लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराला पूर्णपणे तयारी करून ठेवा देवाची इच्छा असेल तर ही संधी लवकरच येईल असेही द्विवेदी यांनी यावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com