"मी जर निवडून आलो, तर....",चंद्रपूरच्या सभेत सुधीर मुनगंटीवारांनी थेट सांगितलं
"खोटं बोलण्यात काँग्रेसचा हात कुणी पकडू शकत नाही. काँग्रेसला मत म्हणजे माफियांना मत देणे. अबकी बार ४०० पार होणार. मी जाती-धर्माचं राजकारण केलं नाही. मी विकासाचं राजकारण केलं आहे. जेव्हा तुम्हाला विकास सांगता येत नाही, तेव्हा तुम्ही जात पाहता. १९ एप्रिलला तुमची नौटंकी आणि चेहऱ्यावरचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. मी जर निवडून आलो, तर संसदेत या वाघाच्या भूमीचा आवाज संपूर्ण देश ऐकेल", असं म्हणत चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले, मी नेहमी विकासाचं राजकारण केलं. निवडणूक विकासावर होऊ द्या. तुम्ही तुमचा विकास दाखवा. मी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला विचारलं की, तुझी विकासकामे सांग. पण त्याला सांगता आलं नाही.
तसंच चंद्रपूरच्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीला संपवण्याचं राहुल गांधींचं स्वप्न धुळीला मिळेल. मोदींच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं. आता चंद्रपूरचं यान सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात थेट संसदेत उतरेल. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा कायापालट केला आहे. सुधीर भाऊंना आणि अशोक नेते यांना चंद्रपूरचा आवाज बुलंद करण्याकरता दिल्लीत पाठवा.