Jharkhand Accident : झारखंडमध्ये भीषण अपघात; 19 कावडियांचा मृत्यू
(Jharkhand Accident) झारखंडमधील देवघर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत 19 कावड यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. गोड्डा-देवघर राष्ट्रीय महामार्गावर मोहनपूर पोलीस ठाणे हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कावड यात्रेकरूंनी भरलेल्या खासगी बसला समोरून येणाऱ्या गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. जखमींना तातडीने देवघर येथील जिल्हा रुग्णालय व इतर आरोग्य केंद्रांमध्ये हलवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दुमका विभागाचे पोलीस महानिरीक्षक शैलेंद्र कुमार सिन्हा यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण धडकेमुळे ही दुर्घटना घडली. अपघाताच्या ठिकाणी पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ बचावकार्य राबवले.
दरम्यान, सध्या श्रावण महिना सुरू असून, बाबा बैद्यनाथ धाम येथे लाखो भाविक कावड यात्रा घेऊन येतात. सोमवारी देवघर येथे सुमारे 3 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. त्यामुळे रस्त्यांवर मोठी गर्दी आहे.या घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली असून, प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाला अलर्ट करण्यात आले असून, वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.