Ashish Shelar : 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य; फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर
(Ashish Shelar) ज्या 50 चित्रपटांना आपण सन्मानित करतो आहोत, सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे तेही वेगळे ठरले आहेत. 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य आपणास वितरित करत आहोत. ही केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक आशय असलेल्या नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करणाऱ्या प्रेक्षकांच्या जाणीव जागृतीला हातभार लावणाऱ्या मराठी चित्रपटांना मदत करण्यासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे.फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे असेही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.
महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात ,सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा, गणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर,चित्रपट सृष्टीतील कलाकार ,दिग्दर्शक, यासह पुरस्कार विजेते उपस्थित होते.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, चित्रपट हा फक्त मनोरंजन देणारा प्रयोग नाही; तो समाजाच्या मनाशी थेट संवाद साधणारे, विचार जागवत राहणारे शक्तिशाली माध्यम आहे. मराठी आणि भारतीय चित्रपटांनी स्त्री-समानता, जातीय समता, पर्यावरण, ग्रामीण जीवन, नवउद्योग या असंख्य विषयांवर गेल्या दशकांत जनजागृती केली आहे.फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे. फिल्म सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातच अद्यावत ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग सेंटर मुंबईत उभा करणार आहोत असेही ते म्हणाले.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, आज 50 चित्रपटांत – राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 4 चित्रपट, राज्य पुरस्काराने गौरवलेले 3 चित्रपट, ‘अ’ दर्जा प्राप्त 10 चित्रपट, ‘ब’ दर्जा प्राप्त 23 आणि ‘क’ दर्जा प्राप्त 10 चित्रपटांचा समावेश आहे. सुमारे 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य या सर्व चित्रपटांना मिळून एकूण आज आपण वितरित करीत आहोत. मूल्यांकन प्रक्रिया या योजनेकरिता पारदर्शकपणे पार पाडणाऱ्या परीक्षक समितीचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्राने “क्रिएटीव्ह इकॉनॉमी हब” होण्याचा ठोस निर्धार WAVES 2025 या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल समिटमधूनव्यक्त केला आहे. मंत्री शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला संत-महात्मे, क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, कलावंत, खेळाडू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशा महनीय व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे; म्हणूनच शासन विविध क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चरित्रपट निर्मितीची योजना राबवत आहे.

