Union Budget 2026 : आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, सर्वांच्या नजरा बजेटवर

Union Budget 2026 : आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, सर्वांच्या नजरा बजेटवर

आज देशाच्या आर्थिक भवितव्याची दिशा ठरवणारा केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, १ फेब्रुवारी रोजी, लोकसभेत हा अर्थसंकल्प मांडणार
Published by :
Varsha Bhasmare
Published on

आज देशाच्या आर्थिक भवितव्याची दिशा ठरवणारा केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, १ फेब्रुवारी रोजी, लोकसभेत हा अर्थसंकल्प मांडणार असून, संपूर्ण देशाचं लक्ष या बजेटकडे लागलं आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, मध्यमवर्गावरील करांचा बोजा आणि आर्थिक विकासाचा वेग यासारख्या अनेक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे, रविवारी बजेट सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना, पगारदार वर्गाला आणि मध्यमवर्गाला करसवलती मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामान्य माणसापासून ते शेतकरी, छोटे व्यापारी, उद्योजक, महिला आणि तरुणांपर्यंत सर्वांनाच या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सरकार आगामी एका वर्षात कोणत्या योजना राबवणार, कोणत्या क्षेत्रांवर अधिक भर दिला जाणार, याचा स्पष्ट अंदाज या अर्थसंकल्पातून मिळणार आहे. पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्र, आरोग्य, शिक्षण, डिजिटल अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांवर सरकार कोणती दिशा घेणार, यावरही सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, आज रविवार असूनही शेअर बाजार व्यवहारांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे बजेटमधील कररचना, गुंतवणूक धोरण, भांडवली खर्च आणि उद्योगांना दिलासा देणाऱ्या घोषणांचा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर थेट आणि तात्काळ परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, आयटी, संरक्षण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित शेअर्सवर बजेटचा प्रभाव दिसून येऊ शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी ११ वाजता लोकसभेत सुरू होणार आहे. या भाषणातून सरकारच्या आर्थिक धोरणांचा आराखडा समोर येणार असून, आगामी आर्थिक वर्षातील महसूल, खर्च आणि तूट यावर स्पष्ट चित्र मिळणार आहे.

दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिला टप्पा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून, दुसरा टप्पा ९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान होईल. या संपूर्ण अधिवेशनादरम्यान एकूण ३० बैठका होणार आहेत. एकूणच, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ न राहता, सामान्य जनतेला दिलासा देणारा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा ठरेल का, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com