Heat Wave
Heat Wave

Heat Wave : फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा! यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार?

राज्यात उन्हाळ्याने यंदा नेहमीपेक्षा लवकरच हजेरी लावली आहे. अजून मार्च महिना सुरू व्हायचा असताना फेब्रुवारीतच तापमानाने ३३ अंशांचा टप्पा ओलांडला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यात उन्हाळ्याने यंदा नेहमीपेक्षा लवकरच हजेरी लावली आहे. अजून मार्च महिना सुरू व्हायचा असताना फेब्रुवारीतच तापमानाने ३३ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची नोंद वेधशाळेने केली. या हंगामातील ही आतापर्यंतची सर्वोच्च नोंद असून नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.

यंदा हिवाळा तुलनेने कडक होता. जानेवारी महिन्यात किमान तापमानात मोठी घट झाली होती आणि शहरवासीयांना चांगलीच हुडहुडी भरली होती. मात्र आता वातावरणात झपाट्याने बदल होत असून उन्हाळ्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तापमान सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

फक्त कमाल तापमानच नव्हे तर किमान तापमानातही वाढ दिसून येत आहे. ते १७.१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. परिणामी सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर वर्दळ कमी झालेली दिसत आहे. नागरिक सावलीचा आधार घेत आहेत. मात्र पहाटेच्या वेळी अजूनही थंडीचा हलका कडाका कायम आहे. दिवस-रात्र तापमानातील हा फरक आरोग्यावर परिणाम करू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट लवकरच तीव्र होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारी अनावश्यक बाहेर पडणे टाळणे आणि हलके, सूती कपडे परिधान करणे आवश्यक आहे. यंदा एल निनोचा परिणाम, हवामानातील बदल आणि वाढती शहरीकरणाची प्रक्रिया यामुळे उन्हाळा अधिक तापदायक ठरू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे. शेती क्षेत्रावरही या वाढत्या तापमानाचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, फेब्रुवारीतच उन्हाने कडकडीत सुरुवात केल्याने यंदाचा उन्हाळा किती तापणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com