Operation Mahadev : पहलगाममधील तीन दहशतवादी ऑपरेशन महादेवमध्ये ठार? लष्कराकडून 'ही' माहिती समोर
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना श्रीनगरमध्ये सैन्याने तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी 28 जुलैला या दहशदवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती लष्कराच्या चिनार कॉर्प्सनेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे पोस्ट करत दिली आहे. दहशतवाद्यांवर कारवाई सुरू करण्यासाठी एक ऑपरेशन सुरु केले ज्याला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आले.
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये शोध मोहीम सुरू केली. श्रीनगरमध्ये दहशतवादी लपल्याची शक्यता होती, त्यासाठी ऑपरेशन महादेव सुरू करण्यात आले, त्यानंतर संशयित 3 व्यक्तींना ठार करण्यात आलं आहे. यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान, यासिर आणि अली या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत, त्यापैकी सुलेमान आणि यासिर पहलगाम हल्ल्यात सहभागी होते.
मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पहलगाम हल्ल्याशी संबंधित दहशतवादी असू शकतात अशी माहिती आहे. जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये 26 पर्यटकांना धर्म विचारुन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होतं. यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं.
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानचे 9 तळ उद्धवस्त केले. या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या घटनेला आता महिना उलटला आहे. यासंदर्भात भारतीय सुरक्षा दल सतत कारवाई करत असल्याचं पाहायला मिळाल, मात्र त्या चार क्रूर दहशतवाद्यांना पकडता आलं नाही. तर आता ऑपरेशन महादेवमध्ये ज्या 3 दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, ते पहलगाममधील दहशदवादी असल्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे.