BMC Budget : मुंबई महापालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारीला सादर होणार
मुंबई महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या ३ फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, प्रत्यक्षात मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नगरसेवक निवडून आलेले असले तरी अद्याप स्थायी समिती अध्यक्षांची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी हे नामधारी स्वीकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियमानुसार ठरलेल्या वेळेत अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असल्याने ३ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांची निवड न झाल्यामुळे या अर्थसंकल्पातील विकासकामे, विविध योजना, निधीवाटप याबाबत कोणतीही सविस्तर घोषणा करण्यात येणार नाही. हा अर्थसंकल्प ‘बंद स्थितीत’ स्वीकारून ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रशासकीय प्रक्रियेनुसार, हा अर्थसंकल्प प्रथम नामधारी स्वरूपात स्वीकारला जाईल. त्यानंतर पुढील आठवड्यात स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यावर, आयुक्त म्हणून डॉ. भूषण गगराणी हेच अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सविस्तरपणे मांडणार आहेत. यामुळे नियमानुसार अर्थसंकल्प मांडण्याची आणि स्थायी समितीपुढे सादर करण्याची दोन्ही उद्दिष्टे पूर्ण होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक होऊनही स्थायी समितीची रचना अद्याप पूर्ण न झाल्यामुळे प्रशासनाला हा मार्ग अवलंबावा लागत आहे.
नव्याने निवडून आलेले नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावर कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर अर्थसंकल्पावर सखोल चर्चा होऊन विकासकामे, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, जलव्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईकरांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आगामी आर्थिक वर्षात कोणत्या विकासकामांना प्राधान्य दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्थायी समिती अध्यक्षांची निवड आणि त्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चा मुंबई महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.
