Sanjay Raut : ‘अजित पवार यांच्या अपघाताचं रहस्य बाहेर आलंच पाहिजे’ संजय राऊत यांचे मोठे विधान..

Sanjay Raut : ‘अजित पवार यांच्या अपघाताचं रहस्य बाहेर आलंच पाहिजे’ संजय राऊत यांचे मोठे विधान..

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक दावे-प्रतिदावे सुरू असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आणि आक्रमक आरोप करत मोठा दावा केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अजित पवार हे भाजपमधील भ्रष्टाचारावर उघडपणे भाष्य करत होते. विशेषतः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कुत्र्यांच्या नसबंदी प्रकरणात भाजपने कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला, याची संपूर्ण माहिती अजित पवार यांच्याकडे होती. अनेक वर्षे राज्याचे अर्थमंत्री राहिल्यामुळे भाजपच्या आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे अजित पवार यांनी स्वतःकडेच जपून ठेवली होती, असा दावा राऊत यांनी केला.

लोकसभेत राहुल गांधी यांना बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. “सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याची भाजपची पद्धत आहे,” असं ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून तो संशयास्पद असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. “दादांच्या अपघाताचं रहस्य जनतेसमोर आलं पाहिजे. निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या जुन्या वक्तव्यांचा संदर्भ देत म्हटलं की, “दादा म्हणाले होते – मी परत येण्यास तयार आहे.” जर अजित पवार भाजपपासून वेगळे होऊन पुन्हा शरद पवार यांच्याकडे गेले असते, तर भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ला मोठा धक्का बसला असता, असा दावाही त्यांनी केला. “आज परिस्थिती अशी आहे की जो भाजपच्या विरोधात जातो, तो एकतर तुरुंगात जातो किंवा त्याचा जीव धोक्यात येतो,” असे खळबळजनक विधानही राऊत यांनी केले.

भाजपवर अधिक टीका करताना राऊत म्हणाले की, “हा पक्ष आता अजित पवारांचा राहिलेला नाही. गिधाडं त्या पक्षावर तुटून पडली आहेत. हा मराठी पक्ष राहिलेला नाही.” प्रफुल्ल पटेल यांना पक्षाध्यक्ष होण्याची घाई असल्याचा आरोप करत, त्यांनी अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल यांचे संसदेतील फोटो व्हायरल झाल्याचा उल्लेख केला आणि त्यामुळेच संशय बळावल्याचं सांगितलं. यावेळी संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचाही उल्लेख करत, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलिकांकडे असलेल्या नगरसेवकांची “चाटूगिरी” करत असल्याचा आरोप केला. तसेच सावरकर सदनाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र आजही धक्क्यात असून, या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर येण्यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com