Maharashtra Politics : मुंबई महापौरपदावर सस्पेन्स वाढला; आरक्षण सोडतीमुळे महायुतीला धक्का बसणार?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली असली, तरी आता मुंबईचा महापौर कोण होणार, यावरून नवे राजकीय गणित सुरू झाले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार असून, या सोडतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबई महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, यावरून मोठी उत्सुकता आहे.
यंदा महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत चक्राकार पद्धतीने काढली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर जुन्या चक्राकार पद्धतीनुसार सोडत काढण्यात आली, तर भाजप आणि शिंदे सेनेसाठी ही मोठी अडचण ठरू शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण जुन्या पद्धतीनुसार यंदा मुंबई महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे, २००४ सालानंतर मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जमातीचा एकही महापौर झालेला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या चक्राकार नियमांनुसार यंदा हा प्रवर्ग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या निवडणूक निकालानुसार अनुसूचित जमातीचे नगरसेवक केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाकडे आहेत. त्यामुळे अशी आरक्षण सोडत निघाल्यास महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले, “देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल” हे वक्तव्य आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेचे राजकारण जवळून पाहिलेल्या उद्धव ठाकरे यांना आरक्षणाचे हे गणित आधीच माहीत असल्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक हे सूचक वक्तव्य केल्याची चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, जुनी पद्धत न वापरता नवीन चक्राकार पद्धतीने जरी सोडत काढली गेली आणि त्यातही अनुसूचित जमातीचा प्रवर्ग आला, तरी भाजप आणि शिंदे सेनेसमोर अडचण उभी राहणार आहे. कारण त्यांच्या गटाकडे अनुसूचित जमातीचा एकही नगरसेवक नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सत्तेत नसतानाही महापौरपद शिवसेना (उबाठा)कडे जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. आगामी २२ जानेवारीची सोडत मुंबईच्या राजकारणाला नवी कलाटणी देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
