Cabinet Meeting : 'या' आठवड्यात कॅबिनेट बैठक होणार नाही, नेमकं कारण काय ?
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि निवडणुकीच्या धामधुमीमुळे या आठवड्यात होणारी राज्य मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंत्री सध्या आपापल्या मतदारसंघात प्रचार आणि नियोजनामध्ये व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असून, सत्ताधारी आघाडीतील मंत्रीदेखील थेट मैदानात उतरले आहेत. प्रचारसभा, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद आणि रणनीती आखण्यात मंत्र्यांचा मोठा वेळ खर्च होत असल्याने कॅबिनेट बैठकीसाठी आवश्यक असलेली उपस्थिती आणि तयारी होणे कठीण ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या शोक कार्यक्रमांचाही यावर परिणाम झाला आहे. त्यांच्या निधनानंतर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कलश यात्रा, श्रद्धांजली सभा आणि संबंधित कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सहभागी होत आहेत. यामुळे अनेक मंत्री राज्याच्या विविध भागांत प्रवासात असल्याने कॅबिनेट बैठकीसाठी एकत्र येणे शक्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. सामान्यतः आठवड्यातून एकदा होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय, विकासकामांना मंजुरी, धोरणात्मक प्रस्ताव आणि जनहिताशी संबंधित विषयांवर चर्चा केली जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत बैठक रद्द करण्यात आल्याने काही प्रस्ताव पुढील आठवड्यातील बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळात या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, निवडणुकीचे राजकारण आणि शोक कार्यक्रमांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. तथापि, सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, अत्यावश्यक निर्णय आणि फाईल्सवर नियमित पद्धतीने काम सुरू असून प्रशासन ठप्प होणार नाही. पुढील आठवड्यात परिस्थिती सामान्य झाल्यानंतर कॅबिनेट बैठक घेण्यात येईल, तसेच प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
