Mumbai Police : महाराष्ट्र पोलीस भरतीत मोठी संधी!, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही पोलीस भरतीत अर्जाची परवानगी
महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारकडून मोठी सुवर्ण संधी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात तब्बल 15,631 पदांची पोलीस भरती होत असून यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, सन 2022 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही अर्जाची परवानगी मिळणार आहे. गृह विभागाने 10 सप्टेंबर 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे पोलीस दलात नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या भरतीमध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस् मॅन, सशस्त्री पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा पाच प्रकारच्या पदांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक 10,908 पदे पोलीस शिपायांची असून, 2,393 पदे सशस्त्री पोलीस शिपायांची आहेत. याशिवाय, 234 चालक, 25 बॅण्डस् मॅन आणि 554 कारागृह शिपाई पदे भरण्यात येणार आहेत. म्हणजेच, राज्यातील मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. यामुळे उमेदवारांसह विविध संघटनांकडून सरकारवर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात होता. अखेर सरकारने या वर्षी मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे, 2022 ते 2025 या चार वर्षांत वयोमर्यादा ओलांडलेल्यांना एक वेळची सवलत देऊन अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या शुद्धिपत्रकात हे स्पष्ट करण्यात आले असून, हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळणार असून, भरतीची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. पोलीस दलात करिअर करण्याचे स्वप्न असलेले उमेदवार आता अर्ज भरून या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मेगा भरती म्हणजे खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी आहे.