Rohit Pawar : शरद पवारांसमोर शेरोशायरीतून सुरुवात, NCP वर्धापन दिनानिमित्त रोहित पवारांनी गाजवली सभा

Rohit Pawar : शरद पवारांसमोर शेरोशायरीतून सुरुवात, NCP वर्धापन दिनानिमित्त रोहित पवारांनी गाजवली सभा

आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून रोहित पवारांनी भाषण सोबतच शरद पवारांप्रती भावना व्यक्त करत शेरोशायरी केली.
Published by :
Prachi Nate
Published on

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. मेळाव्यात जयंत पाटील, राजेश टोपे, रोहित पवार आदी मान्यवरांनी भाषणे केली. रोहित पवार यांच्या भाषणाच्या घोषणेनंतर संपूर्ण सभागृहात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

रोहित पवार यांनी नेहमीप्रमाणे भाषण न करता शरद पवार यांच्यावरील भावना काव्यरूपात मांडण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांनी काव्यमय शैलीत म्हटले की, " राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक नावाचा झाला विस्तार, पक्षाचे चिन्ह बदललं मात्र हाती आली निष्ठेची तुतारी आणि सोबतीला साहेब आणि यांच्यावर प्रेम करणारे लाखो तुम्ही कार्यकर्ते...” ते पुढे म्हणाले की, हा पक्ष एका लहान रोपट्याप्रमाणे सुरुवातीला होता, पण आज वटवृक्षासारखा भक्कम उभा आहे. काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरले, फांद्यांवर बसलेले पक्षी उडून गेले, तरीही खोड टिकून आहे. आणि हे खोड म्हणजे शरद पवार साहेब.

“अनेक वादळं आली, दुष्काळसदृश परिस्थिती आली, तरीही हा पक्ष तग धरून आहे. सत्तेची छाया आणि विरोधाचे चटके आम्ही अनुभवले. पण माणुसकीचा धर्म सोडलेला नाही, कारण ही पवार साहेबांची तीच शिकवण आहे,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे उदाहरण देत म्हटले, “जसं मुंगी आपल्या घरासाठी अहोरात्र मेहनत करते, तशी आमची कार्यकर्त्यांचीही मेहनत पवार साहेबांच्या पाठीशी उभी आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे.”

पुढे ते म्हणाले, “पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना इतर पक्षांतून संधी आहेत, पण ते आजही पवार साहेबांवर असणाऱ्या प्रेमापोटी आणि निष्ठेमुळे इथे टिकून आहेत. हाच पक्षाचा खरा आत्मा आहे.” “शरद पवार साहेबांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्य केले. त्यांनी पुरोगामी विचारवंतांचा विचार घेऊन हा पक्ष उभारला आहे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहोत,” असे म्हणून रोहित पवार यांनी आपले भाषण संपवले. हा वर्धापन दिन मेळावा पक्षातील एकता, निष्ठा आणि नेतृत्वाच्या सशक्ततेचे प्रतीक ठरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com