Weather Update : ३१ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत देशभर हवामान बदलत, थंडी आणि पावसाचा सामना

Weather Update : ३१ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत देशभर हवामान बदलत, थंडी आणि पावसाचा सामना

राज्य आणि देशातील हवामान सातत्याने बदलत आहे. देशाच्या काही भागात कडाक्याची थंडी, तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्य आणि देशातील हवामान सातत्याने बदलत आहे. देशाच्या काही भागात कडाक्याची थंडी, तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मॉन्सून संपून काही महिने झाले असले तरीही, काही भागांत पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. १ जानेवारी २०२६ रोजीही काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात गारठा वाढत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चांगलाच घसरल्याचे बघायला मिळाले आहे. परभणी जिल्ह्यात राज्यातील नीचांकी तापमान ६.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर धुळे येथे ६.६ अंश सेल्सिअस, निफाड ६.८ अंश, आणि यवतमाळ, अहिल्यानगर, गोदिंया, यवतमाळ व नागपूर येथे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवस परभणी, निफाड आणि धुळ्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एका नवीन पश्चिमी वाऱ्याच्या प्रभावामुळे हवामानात मोठा बदल झाला असून, उंच डोंगराळ प्रदेशात हिमवृष्टी व पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण सततच्या हवामान बदलामुळे थकवा, सर्दी, खोकला, आणि इतर श्वसन समस्या निर्माण होऊ शकतात.

विशेष म्हणजे, ३१ डिसेंबरच्या रात्री पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट ते खूप दाट धुके पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये १ जानेवारीपर्यंत धुक्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट आणि मुझफ्फराबाद येथील काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

१ जानेवारी २०२६ रोजी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये तर, ३१ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही पावसाची शक्यता आहे. थोडक्यात, देशातील हवामानातील बदल सातत्याने होत आहेत—कुठे कडाक्याची थंडी तर कुठे सतत पाऊस, तर काही शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी हवामानानुसार योग्य खबरदारी घ्यावी, अशी शिफारस हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com