चंद्रशेखर बावनकुळेंना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "काळू-बाळूच्या तमाशाने तुमच्या कानाखाली..."
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय, उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा होता. यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हो आहे ना. काळू-बाळूचा तमाशा फार गाजला होता. ती संस्कृती आहे. ते तमाशाचा अपमान करत आहेत. काळू-बाळूच्या तमाशाची महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक ताकद होती. काळू-बाळूंनी एकत्र येऊन देशात जागृती केली आणि समाजसुधारणा केली. त्यांना काळू-बाळू कोण आहेत, हे माहिती नाही. त्यांनी अभ्यास करावं आणि मग बोलावं. हा तमाशा जरी असला, तरी या तमाशाची थाप तुमच्या कानाखाली पडली आहे.
संजय राऊत विरोधकांवर टीका करत म्हणाले, त्यांनी पैशांच्या थैल्या वाटूद्या. टेम्पो भरून माल आणूद्या. दहशत, खोटे गुन्हे, पोलिसांचा वापर, गुंडगिरी काहीही करु द्या. लोक त्यांना मतदान देणार नाहीत. नरेंद्र मोदींनी तर ठाणच मांडला आहे. अमित शहा सारखे येजा करत आहेत. याचा काहीही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी किमान ३५ जागा जिंकेल. शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत. अजित पवारांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत. ते आता मोकळे झाले आहेत. दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरु आहे. पण त्यांची ही अखेरची तडफड आहे.
जवळपास ८०० ते ९०० कोटींचा भुसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका, नगरविकास मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील स्थानिक पुढारी, त्यांच्या मर्जीतले बिल्डर यांनी मिळून ८०० ते ९०० कोटी रुपयांची लूट कशी केली? यात कुणाचा सहभाग आहे, याचे लाभार्थी कोण आहेत, हे उघड करावच लागेल. अशाप्रकारे जनतेच्या पैशांची लूट तुम्ही करणार असाल, तर मोदींना मला दाखवावं लागेल की, तुम्ही खोटारडे आहात. नाशिक महानगरपालिकेची ८००-९०० कोटींची लूट होत आहे, ही लहान गोष्ट नाहीय. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना हे पैसै मिळाले आहेत. काही बिल्डरांना शेतकरी बनवून पैसे कसे दिले, हे या भूसंपादन घोटाळ्यातील मोठं सूत्र आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी विरोधकांवर केला.
राऊत पुढे म्हणाले,नंदूरबारमध्ये यावेळी महाविकास आघाडी जिंकेल. नंदूरबार परंपरेने काँग्रेसचा गड राहिला आहे. इंदिरा गांधींनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्षानुवर्षे नंदूरबारमधून केली आहे. यावेळी प्रियांका गांधी तिकडे आल्या. त्याठिकाणी परिवर्तन होत आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, दिंडोरी, नाशिक, असे उत्तर महाराष्ट्रातले सर्व मतदारसंघ महाविकास आघाडी जिंकेल. निवडणूक रोख्यासंदर्भातील यादी समोर आली आहे.
गोमांस एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी पैसै घेतले आहेत. ५५0 कोटी रुपये घेतले आहेत. गोमांस एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भाजपला पैसै दिले, हे रेकॉर्डवर आहे. एका बाजूला तुम्ही गोमाता हत्या बंदी विरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं. गोमाता, गोमाता करुन गोंधळ घालायचा. पण तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे, असा ढोंग ते करत आहेत.