Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला
धाराशिव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निबांळकर यांची काल शनिवारी (4 मे ) प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करत जोरदार भाषण केलं आहे. तसेच मोदीजी तुमच्यावर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईल, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे
नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, उद्धव ठाकरेंवर संकट आलं, तर मी पहिला त्यांच्या मदतीला धावून जाईन. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरेंनीही प्रेमाने उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मोदी म्हणतात माझ्यावर संकट आलं, तर पहिला मदतीला मी येईन, आज मी सांगतो, मोदीजी तुमच्यावर कधी संकट आलं तर, मीही मोदीजी तुमच्या मदतीला धावून जाईन, पण तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावर आणि देशावर आलाय, ते तुम्ही तुम्हालाच आवर घाला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे. धाराशिवमधील ओमराजे निंबाळकरांच्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमित शाह तुम्ही मला काल काही मुद्द्यांवर बोलण्याचे आव्हान दिले होते. सर्व मुद्द्यांवर बोलण्याची माझी तयारी आहे. जर तुमच्यात थोडीशी लाज असेल, तर जनतेच्या प्रश्नावर बोला. मराठवाड्याला पाणी केव्हा देणार? दहा वर्षात केंद्र सरकारने मराठवाड्याला काय दिलं? ईडी, सीबीआय यांचे घरघडी आहेत. मात्र 4 जून नंतर ते सर्व घरघडी आपल्याकडे येणार आहे. शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या ईडी, सीबीआय पाहून घेऊ, असा इशारा उद्धव ठाकरे यांन दिला आहे.
बाळासाहेबांच्या खोलीत दिलेलं वचन अमित शाहांनी मोडलं आणि मला खोटं ठरवायला निघाले आहेत. मी शेतकऱ्यांनी कर्जमुक्त करुन दाखवेन बोललो, दाखवलं की नाही? 10 रुपयात शिवभोजन थाळी दिली की नाही? कापसाला, सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचं उद्योग माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? याचं उत्तर हो आहे. आता मोदी गॅरेंटी, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का? दोन कोटी रोजगार मिळाले का? पिकविमा मिळाला? सगळ्यांना घर मिळालं? मग खोटं कोण बोलतंय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. यावर गर्दीतून उत्तर आलं मोदी. उद्धव ठाकरेंच्या धाराशिवमधील सभेला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला.