महाराष्ट्रात भाजपाला कुत्रेही विचारणार नाहीत; सामनातून हल्लाबोल

महाराष्ट्रात भाजपाला कुत्रेही विचारणार नाहीत; सामनातून हल्लाबोल

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिल्याने ठाकरे गट चांगलाच तापला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिल्याने ठाकरे गट चांगलाच तापला आहे. या निर्णयानंतर अनेक आरोप - प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल केला आहे. सामनातून म्हटले की, मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला आणि आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले. हिंदुत्वरक्षक, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही. न्याय झाला नाही आणि निकाल विकत घेतला. व्यापाऱ्यांच्या राज्यात दुसरे काय होणार? लढाई सुरूच राहील. असे सामनातून म्हटले आहे.

एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा करावा अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने ठाकऱ्यांनी निर्माण केलेली, जोपासलेली शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्या मिंध्यांच्या हातात दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी मिंध्यांना शिवसेना-धनुष्यबाण मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शाहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शाहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

यासोबतच ‘शिवसेना’ हे नाव आणि चिन्ह विकत घेतल्यानंतर भाजपची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भारतीय जनता पक्षालाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल’ विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही. चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत तसा निकाल विकत घेतला आहे. शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच शिवसेनेवर दरोडा टाकण्यात आला आहे, असा हल्लाबोल करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मेहरबानीमुळेच शिंदे गटाला धनुष्यबाण मिळालं. अमित शाह हे मराठी माणसाचे क्रमांक एकचे शत्रू आहेत. असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com