ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी राहिली नाही, पण...; प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडीचा मविआसोबतचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नाहीय. याच पार्श्वभूमीवर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. मविआसोबत आमची आघाडी आहे. पण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासोबत आघाडी राहिली नाही. मविआचाच्या जागावाटपाच्या तिढ्याबाबत त्यांनाच विचारा. २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका आंबेडकर यांनी मांडली आहे.
प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले, मविआनं आम्हाला कधीच चार जागांची ऑफर दिली नाही. वंचितचा कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा आहे. सहकार्य केलं असतं तर तिढा सुटला असता. काँग्रेसचं सात जागांवर एकमत झालं, तर चांगलं आहे. शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. ह्यांचं १५ जागेचं कोडं उलगडतंय की नाही, हे पाहण्यासाठी २६ तारखेपर्यंत थांबणार.
आमचं ध्येय संविधान बदलण्याचा आहे, असं २०१४ मध्ये भाजपने जाहीर केलं होतं. १९५० मध्येच आरएसएसने स्पष्ट केलं होतं की, ज्या दिवशी आमच्या हातात सत्ता येईल, त्यादिवशी आम्ही हे संविधान बदलणार. आमचं काँग्रेससोबत जमत नाही, असं कुठेही म्हणालो नाही. चर्चा खुल्या मनानं झाली तर, मला आनंद आहे. महविकास आघाडीसोबत आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही, असंही आंबेडकर म्हणाले.