कोस्टल रोडच्या उद्घाटनाआधी वर्षा गायकवाड यांचे ट्विट म्हणाल्या...
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे आज उद्घाटन पार पडणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. कोस्टल रोडच्या उद्घाटन समारंभासाठी आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलं आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेसच्या संकल्पनेतुन आणि पुढाकारातून उदयास आलेले मुंबई कोस्टल रोड प्रकल्प मोठ्या विलंबानंतर आणि लोकार्पणाच्या तारखांवर तारखा पुढे ढकलल्यानंतर शेवटी आज सर्वसामान्यांच्या सेवेत अंशत: खुला होत आहे, याचा आनंद आहे. सत्तेत असलेली मंडळी या कामाचे श्रेय लाटण्याचा कितीतरी प्रयत्न करत असले तरी वस्तुस्थिती हीच आहे की, काँग्रेसनेच या प्रकल्पाची संकल्पना मांडली आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोठे पाऊल उचलले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सदर प्रकल्पाला गती देण्याचेही काम झाले.
मला विश्वास आहे की, पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर हा कोस्टल रिंग रोड मुंबईतील नॉर्थ-साऊथ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून अतिशय फायदेशीर ठरेल. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल आणि यामुळे शहराच्या आर्थिक विकासास आणखीन चालना मिळेल अशी आशा आहे. आमचा ठाम मत आहे की, कोणत्याही सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला पाहिजे. यासाठीच मी सरकारला पुन्हा एकदा आपल्या वचनबद्धतेची आठवण करून देऊ इच्छिते. कोस्टल रोडसाठी एक समर्पित बस लेन असणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण परवानग्या मागताना तसा शब्द आपण पर्यावरण मंत्रालयाला दिला आहे.
तसेच हा रस्ता शेवटपर्यंत टोलमुक्त राहिला पाहिजे या आश्वासनपूर्तीसाठी आम्ही सरकारला धारेवर धरल्याशिवाय गप्प बसणार नाही. यंदाच्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात, महानगरपालिका प्रशासकाने आपल्या भाषणात कोस्टल रोड आर्थिकरित्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी पर्याय शोधण्यासंदर्भात उल्लेख केला होता. सदर मार्ग हा कायमचा टोलमुक्त राहिला पाहिजे, ही भूमिका आम्ही तेव्हाही घेतली होती. आता ही घेतो. असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.