Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; राजकीय गणिताला वेग

Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; राजकीय गणिताला वेग

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून, त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून, त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेची सध्याची सदस्य संख्या २८६ असून, प्रत्येक राज्यसभेच्या जागेसाठी ३६ आमदारांचा मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी संख्याबळाचे काटेकोर गणित मांडण्यास सुरुवात केली आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार महायुतीकडे एकूण २३२ आमदारांचे संख्याबळ आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष कडे करडीले यांच्या निधनानंतर १३६ आमदार आहेत. तीन जागा जिंकण्यासाठी भाजपला १०८ मतांची आवश्यकता असून, त्यांच्या कडे २८ अतिरिक्त मते राहतात. शिवसेना कडे ५६ आमदार आहेत. एका जागेसाठी ३६ मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे २० अतिरिक्त मते उरतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडे ४० आमदार असून, एका जागेसाठी ३६ मतांची गरज पूर्ण केल्यानंतर चार अतिरिक्त मते राहतात.

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ५२ आमदारांचे आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे २० आमदार असून, एका जागेसाठी त्यांना १६ अतिरिक्त मतांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) कडे १० आमदार असून, त्यांना २६ अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडे १६ आमदार असून, एका जागेसाठी २० अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे.

सध्याच्या संख्याबळानुसार महायुती चार ते पाच जागा जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र आहे, तर महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अतिरिक्त मतांचे व्यवस्थापन, अपक्ष आमदारांची भूमिका आणि क्रॉस-वोटिंग यावर अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे. राज्यसभेची ही निवडणूक केवळ संख्याबळाची नाही, तर राजकीय ताकदीचीही परीक्षा मानली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com