येळाकेळी येथे बस चढली धाम नदीच्या पुलाच्या कठड्यावर; बसमध्ये होते चाळीस प्रवासी
भूपेश बारंगे : वर्धा | वर्ध्याकडून आर्वीकडे जाणाऱ्या बसचा येळाकेळी येथे नदीच्या काठावर विचित्र अपघात झाला आहे. बस चक्क नदीच्या पुलावर असलेल्या कठड्यावर चढली. अचानक घडलेल्या या घटनेने बसमधील प्रवाशांची भंबेरी उडाली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एच 40 वाय 5297 ही बस वर्धेतून आर्वीला 40 प्रवासी घेऊन जात होती. ही बस पुलावरील कठड्यावर चढली खरी पण चालकाचे ब्रेक लागल्याने प्रवासी बचावले, त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी असेच म्हणायची वेळ आली आहे.
सायंकाळी निघालेली वर्धा-आर्वी-वरुड ही प्रवासी घेऊन निघालेली बस येळाकेळी येथे पोहचली. बसचा मध्यभाग पूर्णतः येळाकेळी येथील धाम नदीच्या पुलावरील कठडयावर चढला. लक्षात येताच बस चालकाने ब्रेक मारले. पण बस अर्धीअधिक वर चढली होती. कशीबशी बस थांबली. पण हा थरार अनुभवणाऱ्या प्रवस्यांचा जिवच भांड्यात अडकला होता. लगेच येळाकेळी येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. प्रवास्याना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.